https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

किती चांगले होते ते दिवस?

किती चांगले होते ते दिवस!

किती चांगले होते ते जंगली दिवस आम्हा वाघ, सिंहाचे! हवा मोकळी, स्वच्छ पाणी मुबलक आणि खायला काय तर हरणे, ससे, रानडुकरे यांची निसर्गाकडून भरपूर पैदास! भूक लागली की थोडे धावायचे आणि अगदी सहज शिकार करायची, मिटक्या मारीत मांस खायचे, वरून पाणी प्यायचे, जोडीदार मिळविण्यासाठी थोडी मारामारी करायची आणि मस्त ताणून द्यायची.

पण हा माणूस नावाचा प्राणी कुठून पैदा झाला माहित नाही आणि याने आमची वाट लावली. हा अतिशय बुद्धीमान आणि धूर्त, बेरका प्राणी. या प्राण्याने काय केले तर स्वतःची लोकसंख्या वाढवत आमची जंगले बळकावली, डोंगरे फोडली, मुक्तपणे वाहणाऱ्या नद्या अडवून त्यावर धरणे बांधली आणि आम्हा सगळ्यांच्या बोकांडी हा माणूस बसला. आम्ही जंगलाचे राजे, पण या माणसांनी आमचे काय केले तर आम्हाला सर्कस मध्ये खेळ खेळायला भाग पाडले. सर्कस मधल्या त्या रिंग मास्तरची हिंमत केवढी मोठी! आम्हाला चाबकाचे फटके मारायचा. काहींनी तर आम्हाला माणसांची करमणूक करणाऱ्या चित्रपटात वापरून घेतले. हाथी मेरे साथी हा राजेश खन्नाचा हिंदी चित्रपट बघा म्हणजे कळेल आमचा वापर. पण शेवटी काही दयावान माणसांना आमची दया आली. त्यातून पुढे मग तो सर्कस प्रकार बंद झाला. पण या दयेचा परिणाम तसा तात्पुरता होता. काही अतिशहाण्या माणसांनी मग आमची वाघ व सिंह अशा दोन जातीत विभागणी करून आमच्यापैकी वाघांना ताडोबा जंगलात बंदिस्त केले तर आमच्यापैकी सिंहाना गिर जंगलात बंदिस्त केले. अशाप्रकारे या धूर्त माणसांनी आम्हा वाघ, सिंहाची जातीपातीत विभागणी करून आम्हाला जंगल आरक्षणात बंदिस्त केले.

ती कुत्री या महाधूर्त, बेरक्या माणसांत कशी माणसाळली हे कळत नाही. माणसे खरवस खात असताना शेपूट हलवत एखादा तरी खरवसचा तुकडा फेकावा म्हणून माणसांपुढे लाळघोटेपणा करीत उभी असतात. आम्हाला हे कधीच जमणार नाही कारण जंगले संपली तरी आम्ही जंगलचे राजे आहोत. पण आता नावालाच राजे राहिलो आहोत. आमची राज्ये खालसा करून या धूर्त माणसांनी आमच्या ऊरावर आता सिमेंटची जंगले बांधली आहेत व त्यातील काडेपेट्यांसारख्या घरात ही माणसे स्वतःसाठी शांती शोधत देवाचे अध्यात्म करीत बसलीत. आमचे नैसर्गिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन कसली मिळणार यांना शांती! खरंच किती चांगले होते ते दिवस!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.११.२०२१

दोन वर्ग!

सर्वसामान्य माणूस कोणाला म्हणायचे?

ज्ञान, संपत्तीचे प्रतिनिधित्व करणारा पैसा व शस्त्रबळाचा धाक दाखवणारी सत्ता ही मानवी जगात मानाने जगण्याची तीन प्रमुख साधने आहेत. या साधनांची मालकी कोणाकडे हा मूलभूत प्रश्न आहे. सुशिक्षित, ज्ञानी माणसे ज्ञान साधनाची मालक असतात, अतिश्रीमंत भांडवलदार मंडळी ही संपत्ती आणि/किंवा पैसा साधनाची मालक असतात व प्रभावशाली राजकारणी मंडळी ही शस्त्र आणि/किंवा सत्ता साधनाची मालक असतात.

पण बारकाईने बघितले तर सुशिक्षित, ज्ञानी माणसे ही ज्ञान साधनाची फक्त नावाला मालक असतात कारण त्यांचे ज्ञान भांडवलदार व राजकारणी यांच्या अर्थात अनुक्रमे पैसा व सत्ता यांच्या दावणीला बांधलेले असते. अर्थात इतर शारीरिक श्रमिक मंडळीप्रमाणे ही बौद्धिक श्रमिक मंडळीही भांडवलदार व राजकारणी यांची गुलाम असतात. म्हणजे समाजात ज्ञान, संपत्ती (पैसा), सत्ता (शस्त्र ) या तीन साधनांचे मालक दोनच, एक श्रीमंत भांडवलदार व दोन प्रभावशाली राजकारणी! हे दोन मालक हेच खरे असामान्य लोक, बाकीचे सर्व (सुशिक्षित, ज्ञानी धरून) सर्वसामान्य लोक! अर्थात मानव समाजात दोनच वर्ग व ते म्हणजे साधन मालक अर्थात शोषक वर्ग व मालकांचा गुलाम श्रमिक अर्थात शोषित वर्ग! शोषक वर्ग हा असामान्य वर्ग तर शोषित वर्ग हा सर्वसामान्य वर्ग!

वाईट याचेच वाटते की शोषित वर्ग हा बहुजन समाज वर्ग पण त्यांच्यात पुन्हा जाती पातीचे वर्ग (उच्च जातवर्ग व मागास जातवर्ग) असे वर्ग पाडले जाऊन या बहुजन समाजाचे मालक वर्गाकडून आणखी शोषण होण्यासाठी मदतच होते. जातीपाती नसत्या तर बहुजन शोषित वर्ग एक होऊन साधनांची मालकी स्वतःकडे दाबून ठेवणाऱ्या मूठभर शोषक वर्गाशी बौद्धिक व शारीरिक श्रम भांडवलाच्या जोरावर प्रभावी संघर्षकर्ता झाला असता व त्या संघर्षातून साधनांची मालकी काही प्रमाणात का असेना पण स्वतःकडे खेचून घेऊ शकला असता.

पण बहुजन समाजातच जातीपातीवरून संघर्ष होतोय आणि मूठभर मालक (शोषक) वर्ग आणखी पॉवरफुल होतोय. कधी संपणार हे दुष्टचक्र? आज क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून हा लेख संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.११.२०२१

सर्वसामान्य माणूस!

सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचे फायदे!

१. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने जास्तीच्या पैशाचे काय करायचे याची त्यांना चिंता नसते.

२. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने आपोआप त्यांच्या चैनीला चाप बसून त्यांच्या गरजा कमी होतात.

३. असामान्य माणसांना जास्त लोक ओळखत असतात त्यामुळे त्यांच्या हालचालीवर लोकांचे जास्त लक्ष असते. पण सर्वसामान्य माणसांना कोणी विचारत नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर वडापाव खाता येतो व टपरीवर चहा पिता येतो.

४. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने त्यांना गँगस्टर्स कडून खंडणीची धमकी येण्याची भीती नसते. तसेच इनकम टॕक्स, ईडीच्या धाडीची भीती नसते. त्यामुळे त्यांना शांत झोप लागते.

५. सर्वसामान्य माणसे वस्तू खरेदी करताना न लाजता किंमतीची घासाघीस करू शकतात.

६. असामान्य माणसांना आयुष्याचे जोडीदारही असामान्य लागतात. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली तर एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला भारी पडू शकतो. सर्वसामान्य नवरा बायकोचे तसे नसते. त्यांच्यात भांडणे झाली तरी दोघेही कमकुवत असल्याने एकमेकांना नीट समजून घेऊन दोघेही तडजोड करून सामोपचाराने संसार करतात.

७. कुठे परगावी फिरायला गेले तर असामान्य माणसे भारी लॉजमध्ये जातात. सर्वसामान्य माणसे मात्र साधे लॉज शोधतात पण त्यातला आनंद लय भारी असतो.

८. सर्वसामान्यांना त्यांच्या मुलांना भारी शाळांत घालता येत नाही कारण त्यांच्याकडे मोठी फी देण्यासाठी पैसा नसतो. पण त्यांची मुले हुशार असतात. ती ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या शाळांत शिकूनही श्रीमंत मुलांना शिक्षणात भारी पडतात.

९. असामान्य माणसे आजारी पडली की भारी डॉक्टर्स, भारी रूग्णालये गाठतात. सर्वसामान्य माणसांना गल्लीतला साधा डॉक्टर पुरेसा होतो. जास्त आजारी पडल्यावर सरकारी रूग्णालये सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी जवळजवळ फुकट तत्पर असतात. शेवटी काय मरण जवळ आल्यावर असामान्य माणसे पंचतारांकित रूग्णालयात तळमळत मरतात व सर्वसामान्य माणसे सरकारी रूग्णालयात तळमळत मरतात. शेवटी वेदना, तळमळ दोन्ही रूग्णालयात असते. मग फरक काय पडतो, इथे मेले काय आणि तिथे मेले काय?

सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचे आणखी तसे खूप फायदे आहेत. असामान्य माणसांना त्यांच्या असामान्यत्वाची टिमकी वाजवत जगू द्या. त्यांना जास्त भाव देऊ नका. सर्वसामान्य जगण्यातला मुक्त आनंद घ्या.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.११.२०२१

हनी ट्रॕप व हॕकर्स!

हॕकर्स व हनी ट्रॕपवाल्यांनी फेसबुकवर हा काय खेळ चालवलाय?

फेसबुक हॕकर्स व हनी ट्रॕपवाले हल्ली मोकाट सुटलेले दिसतात. गेल्या आठवड्यात मलाही माझ्या फेसबुक मेसेंजर इनबॉक्स मध्ये माझ्या एका फेसबुक मित्राने एक लिंक पाठवली व मला इशारा केला (केला इशारा जाता जाता) की ती लिंक उघडू नये. कारण त्याच लिंकने त्याचे फेसबुक खाते हॕक झाले आहे. पण मला जाम चरबी. मी ती लिंक उघडली जेणेकरून माझे फेसबुक खाते हॕक होईल व इकडेतिकडे फिरत राहील. काय माहित कदाचित माझे ते खाते फिरतही असेल. बोंबलत फिरू द्या त्याला मला काही फरक पडत नाही. कारण एकदा असेच एका बदमाश टोळीने माझ्या फेसबुक इनबॉक्स मध्ये मध्यरात्री घुसून मला मधाचे बोट दाखवून हनी ट्रॕप केले होते. मग मी त्या टोळीलाच त्याचवेळी ट्रॕप करून ठाणे सायबर पोलिसांना पहाटे तक्रार केली. आता पुन्हा हा नवीन हॕक लिंकचा प्रकार. या लोकांना काय कामधंदा नाही काय? कशाला उगाच त्रास देतात माझ्यासारख्या सरळमार्गी माणसाला? मी त्यांचे काय वाकडे केले आहे? आता त्या फेसबुक मित्राला तरी मला तसली लिंक पाठवायची काय गरज होती? त्याचे खाते हॕक झाले म्हणून माझेही खाते हॕक व्हावे अशी त्याची इच्छा होती काय? अरे बाबा, तुझे हॕक झालेले ते खाते माझ्या फेसबुक मित्र यादीत ठेऊन काय करू? इतर मित्रांना पण तो हॕक वायरस चिकटायचा व करोना विषाणू प्रमाणे  त्रास द्यायचा. थांब आता मी तुलाच ब्लॉक करतो असे इनबॉक्स मध्ये लिहून मी जाता जाता इशारा करणाऱ्या त्या मित्रालाच ब्लॉक करून टाकले व त्या हॕक झालेल्या खात्याचा संबंध तोडून टाकला. थोडक्यात काडीमोडच घेतला मी. एकतर रोज नवीन नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाने माझे डोके फिरायची वेळ आलीय म्हातार वयात आणि आता या वयात असल्या भलत्याच तांत्रिक भानगडी ऊरावर घेऊन कोण बसतोय. माझ्याकडे आता वकिलीची जास्त कामे नाहीत हे तरीषअनोळखी लोकांना कसे काय कळते बुवा? अधूनमधून सारखे माझ्या फोनवर लघुसंदेश येत असतात की घरी बसून दररोज १००० रूपये कमवा म्हणून. मी काय या लोकांना कामाची किंवा पैशाची भीक मागत फिरतोय काय? मग वैतागून मी तो तसला एस.एम.एस. फोनमध्ये दिसला रे दिसला की लगेच डिलिट करून टाकतो. कुठून हे असले अॉनलाईन तंत्रज्ञान आलेय काय माहित? पूर्वी किती मस्त होते. सगळं हाताने लिहायचे. साधे पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र लिहिण्यात किती मजा होती. चोरी लगेच पकडली जायची. मी एकदा असेच हस्तलिखित प्रेमपत्र कॉलेजमध्ये एका मुलीच्या वहीत कोंबले होते. पण माझ्या हस्ताक्षरावरून माझी ती चोरी पकडली गेली होती. मग त्या मुलीने नंतर माझ्याशी बोलणेच सोडले होते. हल्ली काय कोणीपण उठतो आणि दुसऱ्याचे इलेक्ट्रॉनिक लिखाण चोरतो व स्वतःच्या नावाने खपवतो. कसला कॉपीराईट कायदा आणि कसले काय? या डिजिटल किंवा अॉनलाईन तंत्रज्ञानाने माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची मात्र अधूनमधून बोबडी वळत असते हे मात्र खरे!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.११.२०२१

https://www.tv9marathi.com/crime/cyber-crime/marathi-actress-shubhangi-gokhale-facebook-account-hacked-appeals-friends-to-not-click-on-suspicious-links-in-messenger-586075.html

चौकट!

चौकट!

चौकटीबाहेर जाऊन जीवन जगण्याचा किंवा प्रवाहाविरूद्ध पोहण्याचा प्रयास हा शेवटी महागात पडतो. याचा अर्थ असा नव्हे की माणसाने प्रवाहपतित होऊन जीवन जगावे. तसे असते तर मनुष्य जनावरांच्या पातळीवर जंगली जीवनच जगत राहिला असता.

पण तरीही आयुष्याला चौकट हवी. बेभान, मुक्त जीवन म्हणजे कटी पतंग जीवन. म्हणून मी पुरूष मुक्ती व स्त्री मुक्ती या दोन्ही विचारांना अतिरेकी विचार समजतो. याचे कारण म्हणजे निसर्गाची चौकटच अशी आहे की स्त्री व पुरूष दोघेही एकमेकांसाठी बनले आहेत. त्यांचे एक होणे, एकत्र राहणे, एकमेकांसाठी जगणे हेच तर स्त्री शक्ती व पुरूष शक्ती यांच्या निर्मितीच्या मागील निसर्गाच्या अनाकलनीय मुळाचे अर्थात परमेश्वराचे मूळ उद्दिष्ट आहे. स्त्री मुक्ती काय किंवा पुरूष मुक्ती काय हे अतिरेकी विचार या मूळ उद्दिष्टाला, पायाला छेद देणारे घातक विचार आहेत.

मानवी जीवनाला दोन चौकटी आहेत. एक चौकट ही निसर्गाची मूळ वैज्ञानिक चौकट व दुसरी चौकट ही समाजाची पूरक सामाजिक चौकट! या दोन्ही चौकटींची मिळून कायदेशीर चौकट तयार होते. मनाचे काल्पनिक बुडबुडे व निसर्गाचे वास्तव सत्य यात फरक आहे. 

निसर्गाच्या वैज्ञानिक चौकटीत राहून माणसांनी माणसांसाठी तयार केलेली सामाजिक चौकट म्हणजे सामाजिक कायद्यांची (नीतीनियमांची) चौकट ही बुद्धीच्या जोरावर समाजमनाने तयार केलेली विशेष चौकट होय. जंगली जनावरे निसर्गाच्या मूळ चौकटीतच जीवन जगणे पसंत करतात कारण त्यांना उच्च श्रेणीची कुशाग्र मानवी बुद्धी नसते. त्यामुळे बळी तो कानपिळी या निसर्गाच्या मूळ जंगली नियमापलिकडे ती विचार करू शकत नाही. निसर्गातील मूळ शक्तीला म्हणजे अनाकलनीय परमेश्वरालाच या जंगली नियमाचा उबग आल्याने त्याने उच्च बुद्धीचा मनुष्य प्राणी निर्माण केला असावा.

पण सगळी माणसे सारख्या बुद्धीमत्तेची का दिसत नाहीत? सगळी माणसे समान बौध्दिक पातळीवर असती तर त्यांच्यात खरी समानता निर्माण झाली असती. पण मानवी समतेचे तत्व सामाजिक कायद्यात समाविष्ट केले असले तरी प्रत्यक्षात ते दिसत नाही याचे कारण म्हणजे माणसांमधली असमान बौध्दिक पातळी.

आता मी सांगत असलेल्या वरील दोन चौकटी किती जणांना नीट समजल्या आहेत? मुळात या दोन चौकटी अस्तित्वात आहेत का इथूनच वादाला सुरूवात होईल. देव अस्तित्वात आहे की नाही अर्थात ती कल्पना आहे की वास्तव आहे या वादाप्रमाणेच या दोन चौकटी वास्तवात आहेत की त्या केवळ कल्पना आहेत इथून या आंतरमानवी वादाला सुरूवात होईल. याचे मूळ कारण म्हणजे या दोन चौकटी समजून घेण्याची निरीक्षणशक्ती व आकलनक्षमता अर्थात बुद्धी  सगळ्या माणसांना सारखी असत नाही. म्हणून तर समाजात खालच्या पातळीवरील कनिष्ठ न्यायालयांपासून वरच्या पातळीवरील उच्च व सर्वोच्च न्यायालयांपर्यंत खालून ते वर अशा चढत्या क्रमाने वेगवेगळी न्यायालये आहेत.

या लेखाचा सार एवढाच आहे की वरील दोन चौकटीत राहून बंदिस्त जीवन जगताना मानवी मनाची घालमेल, कुतरओढ झाली तरी या दोन चौकटीत राहून जीवन जगणे मनुष्याच्या हिताचे आहे. निसर्गाची मूळ वैज्ञानिक चौकट व मानव समाजाची पूरक सामाजिक चौकट या चौकटी पलिकडे निसर्गातील देवाचा कोणता धर्म नाही की कोणते अध्यात्म नाही. जे काही आहे ते या दोन चौकटीतच आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२९.११.२०२१

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

अतिविचार, अतिशहाणपणा!

निसर्गाची विविधता माणसाला अतिविचारातून अतिशहाणपणा करण्यास उद्युक्त करते?

माणूस विकास करतो म्हणजे काय करतो तर निसर्गाच्या मोहाला बळी पडतो व त्या मोहाने अतिविचार करून अतिशहाणपणा करतो. हा अतिशहाणपणा म्हणजे मानवी विकास. मानव समाजाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर हा खरं तर अतिविचारी माणसाच्या अतिशहाणपणाचा विकासदर असतो. निसर्गाची विविधता व त्यात भरीस भर म्हणजे माणसाची चौकस बुद्धी हा या विकासदराचा मुख्य आधार आहे.

साधे पाण्यात पोहण्याचे उदाहरण घ्या. नदीच्या किनारी बसून पाण्यात मासे कसे पोहतात हे बघता बघता माणसाच्या डोक्यात आपण असे पोहू शकतो का असा विचार आला. मग त्या माशांचे निरीक्षण, पाण्याच्या खोलीचा अंदाज व पाण्याच्या गुणधर्माचे परीक्षण या गोष्टी आल्या व त्यातून मनुष्य पाण्यात पोहायला शिकला. या ज्ञानातून पुढे माणसाने पाण्यातून प्रवास करणारी मोठमोठी जहाजे बनविली. त्यानंतर मामसाने आकाशात उडणाऱ्या पक्षांचे निरीक्षण व हवेच्या गुणधर्माचे परीक्षण करून हवेत प्रवास करणारी विमाने बनविली. वाघ, सिंह, हरणे, घोडे यांच्या पळण्याच्या वेगाचे व पेट्रोल, डिझेल, वीज यांच्या शक्तीचा अभ्यास करून व पुढे चाकाचा शोध लावून मोटारी, रेल्वे निर्माण केल्या. ही सर्व तांत्रिक प्रगती करण्यास दोनच गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्या दोन गोष्टी म्हणजे निसर्गाच्या विविधतेचे मानवी मनाला भुरळ पाडणारे विज्ञान व मनुष्याची चौकस बुद्धी!

मानवी चौकस बुद्धीने मिळविलेले निसर्गाच्या विविधतेच्या विज्ञानाचे विविध प्रकारचे ज्ञान हे मानवाचे महत्वाचे नैसर्गिक साधन आहे. हे नैसर्गिक साधन व पैसा हे या ज्ञानातूनच निर्माण झालेले मानवनिर्मित कृत्रिम साधन या दोन साधनांच्या जोरावर आधुनिक मनुष्य तांत्रिक व सामाजिक जीवन जगत आहे. सत्ता हे या दोन साधनांतून मनुष्यानेच निर्माण केलेले तिसरे कृत्रिम साधन. अर्थात आधुनिक मनुष्य ज्ञान, पैसा व सत्ता या तीन साधनांच्या जोरावर उच्च विकसित जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे व त्याचा विकासदर वाढविण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीत आहे.

वरील तीन साधनांची (ज्ञान, पैसा, सत्ता) आंतर मानवी देवाणघेवाण करण्यासाठी आंतरमानवी संवाद महत्वाचा होता म्हणून मनुष्याने भाषा हे संवादाचे माध्यम निर्माण केले. पण पैशाला भौतिक (मटेरियल) देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून कायम ठेवले. भाषा व पैसा ही माध्यमे आहेत तशी साधनेही आहेत. पण भाषेकडे साधनाऐवजी माध्यम म्हणूनच जास्त बघितले जाते.

आंतरमानवी भाषा संवाद असो की ज्ञान, पैसा व सत्ता या साधनांची आंतरमानवी भौतिक देवाणघेवाण असो (ज्यात मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू व सेवांची भौतिक  देवाणघेवाण येते) यांचा मूलभूत पाया (उद्देश) मानवी स्वार्थ हाच आहे. या स्वार्थाचे हळूहळू पुढे तीन वर्ग निर्माण झाले. पहिला वर्ग माया, प्रेमाचा, दुसरा वर्ग माणुसकीचा व तिसरा वर्ग निव्वळ स्वार्थाचा.

पहिला वर्गात आपले कुटुंब येते. आईवडील, पती पत्नी व स्वतःची मुले (लग्नानंतर भाऊ बहिणी वेगळ्या होतात) या स्वतःच्या कुटुंब सदस्यांत स्वार्थाला माया, प्रेमाचा ओलावा  चिकटलेला असल्याने भाषा संवाद व भौतिक देवाणघेवाणीत स्वार्थाचा थोडा त्याग करून कौटुंबिक नातेसंबंधाचा निर्मळ आनंद घेण्याचा प्रयत्न केला जातो. हातचे राखून संवाद व देवाणघेवाण हा प्रकार कौटुंबिक नाते संबंधात नसतो. या संबंधात सामाजिक कायद्याच्या दंडकाची तशी गरजच नसते. सर्व व्यवहार सुरळीत, सहज नैसर्गिकरीत्या पार पडतात.

दुसऱ्या वर्गात जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार व एकंदरीत मानव समाज येतो. इथे थोडे हातचे राखून संवाद व देवाणघेवाणीचा आंतरमानवी व्यवहार केला जातो. पण या संबंधात स्वार्थाला माणुसकीचा ओलावा चिकटलेला असल्याने योग्य मोबदल्याचा योग्य व्यवहार (इंग्रजीत फेयर बिझिनेस) हा प्रकार असतो. या योग्य व्यवहाराचे (फेयर बिझिनेसचे) कायदेशीर नियमन करण्यासाठी सुधारक मानव समाजाने दिवाणी कायदा (सिव्हिल लॉ) निर्माण केला आहे.

तिसरा वर्ग मात्र निव्वळ स्वार्थाचा! या वर्गात माया, प्रेम किंवा माणुसकीला बिलकुल थारा नसतो. कसेही करून दुसऱ्याकडून ओरबडून घ्यायचे ही नीच प्रवृत्ती इथे असते. या वर्गातील लोक भ्रष्टाचार व त्याही पुढे जाऊन अत्याचार करायला मागेपुढे पहात नाहीत. या वर्गातील लोकांना कायदेशीर सरळ करण्यासाठीच तर सुधारक मानव समाजाने फौजदारी कायदा (क्रिमिनल लॉ) निर्माण केला आहे.

वरील विवेचनावरून लक्षात येईल की मानवी जीवन किती आव्हानात्मक आहे ते! पण काय करणार, नशिबाचा किंवा योगायोगाचा भाग आहे या जगात मनुष्य म्हणून जन्माला येणे हे. माणसाला माणूस म्हणून जन्म घेताना माहित असते का की आपल्या वाट्याला निसर्ग व मानव समाजाने एवढी मोठी प्रचंड विविधता व त्यातील प्रचंड मोठी आव्हाने वाढून ठेवलीत म्हणून!

-ॲड.बी.एस.मोरे©१.१२.२०२१

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

आध्यात्मिक नव्हे तर वास्तविक!

आता आध्यात्मिक नाही तर वास्तविक!

देवा असशील जर तू कुठे तर प्रेम दे, शक्ती दे! कारण तूच जर प्रेमहीन, शक्तीहीन झालास तर  तुझा आम्हाला उपयोगच काय? हे जग जर तूच बनविले असेल तर ते उपयुक्ततेचे जग आहे हे काय तुला सांगायला हवे? आम्हाला नको इथे कोणाची पोकळ शाब्दिक शाबासकी! देवाचे आध्यात्मिक जग ही एक कवी कल्पना आहे हे आम्हांस कळून चुकलेय. तुझे हे जग भौतिक आहे व त्यामुळे या जगात आम्ही जर निसर्ग व समाज उपयुक्त काही नैसर्गिक कर्म केले तर त्याचे फळ आम्हाला भौतिक मोबदल्यात नको का मिळायला? पैशाने भौतिक गोष्टी विकत घेता येतात तर मग आमच्या उपयुक्त भौतिक कर्माचा मोबदला आम्हाला पैशात मिळायला नको का? किती लबाड माणसे तू या जगात निर्माण केली आहेस? हातचे राखून वरवरचे सांगत स्वतःच्या भौतिक स्वार्थाचे समाधान किती लबाडीने करतात ही माणसे! इतकेच नव्हे लबाडीच्याही पुढे जाऊन दुष्ट, हिंस्त्र होत काही माणसे स्वतःच्या भौतिक स्वार्थाचे नीच समाधान जबरदस्तीने करताना दुसऱ्यावर खूप अत्याचार, बलात्कारही करतात. आणि हे सर्व तुझ्यासमोर घडत असताना तू मात्र मख्खपणे बघत राहतोस. कसा विश्वास ठेवावा आम्ही तुझ्यावर? म्हणून तू एक थोतांड आहेस ज्या थोतांडावर तुझ्या भौतिक जगातील लबाड माणसे अज्ञानी व सरळमार्गी माणसांची घोर फसवणूक करीत आहेत असे आम्हाला वाटले तर त्यात आमचे काय चुकले? त्यामुळे आता यापुढे आध्यात्मिक नाही तर वास्तविक रहायचे निदान मी तरी ठरवलेय! सांभाळून घे रे बाबा!

-ॲड.बी.एस.मोरे©३०.११.२०२१