https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

अट्टाहासी मेंदूमन व मनःशांती!

अट्टाहासी मेंदूमन व मनःशांती!

विश्व किंवा निसर्ग हे एक प्रचंड मोठे झाड आहे ज्याच्या फांद्या अनेकविध व फळेही अनेकविध पण या झाडाची मुळे किंवा मूळच माहित नाही. असेच फोफावत गेलेले, वाढलेले हे झाड. या झाडाच्या मुळाला आम्ही देव म्हणतो. हा देव या विश्वाचा किंवा निसर्गाचा निर्माता व आधार आहे अशी जगातील सर्व आस्तिकांची धारणा! सगळ्या विश्वाचा किंवा निसर्गाचा एकच देव किंवा परमेश्वर ही झाली एकेश्वरी कल्पना! पण झाडाला जशी अनेक मुळे असतात तशा हिंदू धर्मात विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या अनेक देवदेवता आहेत. पण तरीही या सर्व देवदेवता एकाच परमेश्वराच्या किंवा परमात्म्याच्या शाखा आहेत असेही हिंदू धर्म मानतो.

एक गोष्ट मात्र खरी की विश्व किंवा निसर्गरूपी झाडाला जी अनेकविध फळे लागतात त्यांची चव ही झाडाच्या मुळांप्रमाणे घेता येत नाही तर त्या फळांच्या चवीप्रमाणेच घेता येते. म्हणजे विश्व किंवा निसर्गाच्या मुळाशी देव आहे असे मानले तरी विश्वाचा किंवा निसर्गाचा अनुभव हा देवाप्रमाणे नाही तर विश्व किंवा निसर्गाप्रमाणेच घ्यावा लागतो. मग देवाचा धर्म व निसर्गाचे विज्ञान यांची सांगड कशी घालायची? इथेच तर मानवी मनाचा खरा गोंधळ उडतो. हा गोंधळ का उडतो कारण माणसाने न दिसणाऱ्या व न अनुभवता येणाऱ्या देवाचा धर्म बनवला व तो निसर्गाच्या विज्ञानात घुसवला.

माणसाच्या कवटीत जो मेंदू आहे तो कवटीतून बाहेर काढला की मानवी शरीराचा एक मांसल अवयव म्हणून दृश्य होतो. पण या दृश्य मेंदूत असलेले मेंदूमन मात्र अदृश्य असते आणि हीच तर खरी निसर्गरूपी झाडाची किमया आहे. हे मेंदूमन निसर्गातील अनेकविध फांद्या स्वतःच्या ताब्यात ठेवून त्यावरील अनेकविध फळांची मालकी स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करते व मग त्या फांद्यांनी व फळांनी मेंदूमनाच्या मर्जी किंवा इच्छेनुसारच वागले पाहिजे असा निरर्थक  अट्टाहास करते.

वास्तविक विश्व किंवा निसर्ग रूपी झाडाच्या अनेकविध फांद्या व अनेकविध फळे निसर्ग नियमांप्रमाणे (जे नियम विज्ञानाचा मुख्य भाग आहेत) वागतात. निसर्गाचा हा सर्व लवाजमा मेंदूमनाच्या ताब्यात राहणे शक्यच नाही. अहो, मेंदूला चिकटलेल्या शरीराचे अवयव तरी या मेंदूमनाच्या ताब्यात राहतात का? प्रत्येक अवयवाचा नमुना वेगळा व कार्यपद्धती वेगळी. या सर्व इंद्रिये, अवयवांचा राजा बनून त्यांच्यावर नियंत्रण ठेवतानाच मेंदूमनाची खूप त्रेधातिरपीट उडते. मग निसर्गाच्या अनेकविध फांद्या व फळांचे अनेकविध भाग असलेल्या वस्तू व माणसांवर नियंत्रण ठेवण्याची मेंदूमनाची काय पात्रता! ही विश्वमाया आहे. मेंदूमनाला हे कळते पण वळत नाही. एवढे कळूनही मेंदूमन विश्व/निसर्ग नियंत्रणाचा अट्टाहास करतेच व त्या नादात स्वतःची शांती हरवून बसते. मग देवाची ध्यानधारणा, प्रार्थना यातून आभासी शांती मिळविण्याचा प्रयत्न करते. खरं तर, आपल्याच इच्छेप्रमाणे जगाने वागले पाहिजे हा अट्टाहास सोडला की मनाला आपोआप शांती मिळते. त्यासाठी देवाच्या ध्यानधारणेची किंवा प्रार्थनेची बिलकुल गरज नसते. आपले शरीरच धड आपल्या ताब्यात नाही मग आपल्या घरातील माणसांनी म्हणजे आपला जीवनसाथी (पती/पत्नी), मुलेबाळे यांनी आपल्या ताब्यात रहावे, आपल्या मर्जी, इच्छेनुसार वागावे हा मेंदूमनाचा अट्टाहास किती वाईट बरे.

मेंदूमनाचा त्यापुढील मूर्ख अट्टाहास म्हणजे आपल्या नातेवाईकांनी, आपल्या मित्रांनी आणि इतकेच काय समाजातील अनोळखी माणसांनी सुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे वागावे. शक्य आहे का हे? वागू द्या या अनेकविध फांद्या व फळांना त्यांच्या विशिष्ट गुणधर्म व आवडीनिवडी प्रमाणे व निसर्ग नियमांप्रमाणे! सोडून द्या हो तुमच्या मेंदूमनाचा निरर्थक अट्टाहास की त्यांनी तुमच्या ताब्यात राहून तुमच्या मर्जी, इच्छेप्रमाणे वागावे. तुमच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला येणाऱ्या वस्तू व माणसांकडून जास्त अपेक्षा करायच्या नाहीत. त्यांच्या व तुमच्या संबंधातील मर्यादित शेअर ओळखा. व्यावहारिक काय किंवा माया, प्रेमाचा काय, देवाणघेवाणीचा तेवढाच शेअर घ्या व द्या व मग पुढच्या सर्व अपेक्षा सोडून द्या. असे केले तरच तुमच्या मेंदूमनाला मनःशांती मिळेल.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.१०.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा