https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

महाभारत व कायदा!

श्रीकृष्णाच्या साक्षीने महाभारत घडले की श्रीकृष्णानेच ते घडविले?

महाभारताचे युद्ध व त्या युद्धात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता यांचा अभ्यास कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. या युद्धाचा श्रीकृष्ण हा साक्षीदार झाला. त्याच्या साक्षीनेच हे युद्ध लढले गेले. पण या युद्धात श्रीकृष्णाने प्रत्यक्ष भाग घेतला नाही. त्याने त्याचे सैन्य दुर्योधनाच्या बाजूने उभे राहण्याची परवानगी दिली व स्वतः मात्र अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. नुसता सारथी झाला नाही तर सारथ्य करताना पांडवांच्या बाजूने युद्ध जिंकले जावे या उद्देशाने अर्जुनाला गीतेद्वारे युद्धनीतीचे मार्गदर्शन करीत राहीला.

प्रश्न हा आहे की श्रीकृष्ण हा जर श्रीविष्णूचा अवतार म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वर होता तर तो हे युद्ध रोखू शकत नव्हता काय? पण त्याने हे युद्ध होऊ दिले. अधर्मी दुर्योधनाची निर्मिती कोणाची तर श्रीकृष्णाचीच म्हणजे देवाचीच व त्याच्या विरूद्ध धर्माचे युद्ध लढण्यासाठी उभ्या केलेल्या अर्जुनाची निर्मिती सुद्धा कोणाची तर श्रीकृष्णाचीच म्हणजे देवाचीच आणि हे युद्ध रोखता येत असताना सुद्धा ते न रोखता या युद्धाचा फक्त साक्षीदार होणारा कोण तर तोही श्रीकृष्णच म्हणजे देवच! म्हणजे सर्व करून नामानिराळा राहणारा कोण तर देवच! स्वतःच सगळं करायचे पण त्यातून निर्माण होणाऱ्या दुष्परिणामाचा भागीदार मात्र व्हायचे नाही हा देवाच्या कोणत्या धर्माचा प्रकार आहे? खरंच डोके गरगरायला लागते महाभारताचा असा विचार केला तर!

महाभारताचा हा विचार कायद्याला लावला की मग असेच डोके गरगरायला लागते. अर्थकारण सरळ कायद्याप्रमाणे चालले पाहिजे ना! पण नाही त्यात कोणीतरी वाकडी वाट करणार व आर्थिक गैरव्यवहारातून काळी माया जमवून मजा करणार. दुधात मिठाचा खडा टाकून दूध नासवण्यासारखाच हा प्रकार. मग नासलेल्या दुधाला पुन्हा पूर्वीसारखे चांगले दूध करण्याचा खुळा प्रयत्न करीत रहायचे आणि तसे नाही जमले तर मग त्या नासलेल्या दुधाचे पनीर बनवून खायचे. कोणीतरी दुधात मिठाचा खडा टाकतोय हे सरळ समोर दिसतेय पण मुळातच त्याला रोखायचे नाही पण मिठाचा खडा पडून दूध नासले की मग धावाधाव करायची यालाच कायद्याचे राजकारण म्हणतात काय?

करोनाचेच बघा ना! हा करोना निर्माण करणारा देवच व त्याचा प्रतिबंध करणारी लस निर्माण करणाराही देवच! करोना विरूद्ध प्रतिबंधक लस या युद्धात देव प्रत्यक्षात भाग घेत नाही पण या युद्धाचा साक्षीदार मात्र होतो आणि तेही करोना प्रतिबंधक लसीचे सारथ्य करून! काय किमया म्हणायची या देवाची! याच देवावरील श्रध्देने आम्ही "देवाशपथ किंवा ईश्वरसाक्ष खरे बोलेन, खोटे बोलणार नाही" असे म्हणतो ना! आहे की नाही कमाल देवाची व त्याच्या धर्माची म्हणजेच कायद्याची! म्हणून माझा सरळसाधा प्रश्न हाच की, श्रीकृष्णाच्या साक्षीने महाभारत घडले की श्रीकृष्णानेच ते घडविले?

-ॲड.बी.एस.मोरे©६.१०.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा